जसजसा माणूस धर्मांध झाला तसतसा देवाचा भाव ही वाढला
आधी “जत्रा मे बिठाया फत्रा, तीरथ बनाया पानी” असे होते देवाचे स्वरूप
रस्त्याच्या कडेला, उघड्यावर शेंदुराने माखलेल्या दगडाला
येणारे–जाणारे नमन करायचे अन उजाड मजारीवर लहान मुले खेळायचे
त्या देवाला नव्हता कोणाचा राग ना कोणाचा बाट
उदार मनाने तो द्यायचा सगळ्यांना शुभाशीर्वाद
जसजसा माणूस स्वार्थी झाला, एकमेकांना लुबाडू लागला
तसतसा तो मनाने खचू लागला
अन T.V. त दिसणाऱ्या काही श्रीमंत लुचाट बाबांच्या,
मौलवींच्या, पाद्र्यांच्या कचाट्यात सापडून शंकेचे समाधान शोधू लागला
त्यांच्या म्हणण्यानुसार अष्टविनायक, ज्योतिर्लिंगापासून
तर मक्का–मदिना अन व्हॅटकीन सिटी पर्यंत जाऊ लागला
अन पूजापाठ, प्रेअर, इबादतवर वारेमाप खर्च करू लागला
आपल्याकडे येणारा जनतेचा ओघ पाहून
देव ही मनोमन खुश होऊ लागला
अन भक्तांवर केशभूषा, वेशभूषेची बंधने लादू लागला
त्याला ही पॅन्ट–शर्टची लाज वाटू लागली
कंबरेचा पट्टा बाहेर काढून मंदिर–मस्जिदीत
“धोतर अन पंचाच घालून या” म्हणून गळ घालू लागला
धर्मालयातच शोरूम थाटून पैसा कमवू लागला
विशिष्ट वेशभूषा अन केशभूषा केलेल्यांनाच तो आशीर्वाद देऊ लागला
अन गरिबांना कंपाउंड बाहेरूनच हात दाखवून TATA, GOODBYE करू लागला