रस्त्याने जाणाऱ्या अंत्ययात्रेवर नजर पडली
तिरडीवर एका गरीब म्हाताऱ्याचे प्रेत होते
वय वर्षे असावे ८१
वाईट वाटल अन थबकून तिथेच उभा राहत
एकसारखा ती प्रेतयात्रा पाहत राहिलो
वाईट याचे नाही वाटले की तो म्हातारा मरण पावला
वाईट याचे वाटले की तो म्हातारा
“आपल आज ना उद्या चांगल होईल“
या आशेत परमेश्वरावर विश्वास ठेवत जगला
अन शेवटी सुखस्वप्ने पाहतच देह ठेवला
हातात होत्या त्याच्या ग्रहांच्या अंगठ्या,
कपाळावर टिळा, गळ्यात रुद्राक्ष माळा
अन दंडात बांधला होता तावीज काळा
मोठी खंत वाटली ते पाहून
बिचारा आयुष्यभर ग्रह–ताऱ्यांची दशा पाहत जगला
भविष्यकारांच्या, ग्रह वक्री होऊन
होणाऱ्या दुष्परिणामांचे भविष्य ऐकून घाबरला
चांगल व्हाव म्हणून मंदिर, दर्गे, चर्च सारी पालथी घातली
आयुष्य सरल पण परिस्थिती काही नाही सुधरली
शेवटी काळाने त्याच्यावर झेप घेतली
बोटातल्या ग्रहांच्या अंगठ्या बोटातच राहिल्या
पण हया पठ्ठ्याने कधीच सुखाचा क्षण नाही पाहिला
अन शेवटी जीव सोडला
पता नाही तो कोणत्या ग्रहावर गेला
ज्या ग्रह–ताऱ्यांनी त्याला आयुष्यभर आपला नाही केला
ते त्याला आपल्या ग्रहावर घेतीलच कशाला
पण तो ज्या ग्रहांना भिला
त्याच ग्रहांच्या अंगठ्यांनी त्याला सोडून “खो” दिला
निर्जीव होते म्हाताऱ्याचे पार्थिव
अन त्याच्या बोटातल्या ग्रह–ताऱ्यांच्या अंगठ्या होत्या चमकून
ज्या ग्रह–ताऱ्यांनी त्याला छळला, त्यांनीच त्याच्याशी दगा केला
एवढ मात्र नक्की, इतक करूनही तो म्हातारा मातीतच गेला
सोडा अंधविश्वास, नका जाऊ भूत–भविष्याच्या आहारी
खोटी आशा दाखवून, तुम्हाला आशेवर ठेवून, काही स्वार्थी मंडळी
तुमच्या कडून करून घेतात कृत्ये अघोरी