जगात चहूकडे पहा जो तो समाजसेवा करण्याच्या उद्देशाने झपाटला आहे
आणी यातही लोकांच्या समस्यांवर उपाय सांगण्यात तर
जो तो “बाबा” अन “ज्योतिषी” बनला आहे
भगवे, पांढरे, हिरवे, निळे कपडे घालून
स्वतःस देवाचा भगत म्हणविणाऱ्या मंडळींनी
करणी, कवठा, जादूटोणा किंवा न सुटणाऱ्या समस्या क्षणात सोडवू म्हणून
पूजा करून, लिंबू–मिरच्या, हळद–कुंकवाचे तोरण भर रस्त्यात फेकून,
कोंबडे–बकऱ्यांचा बळी देऊन या समस्या सोडविण्याचा ठेकाच घेतला आहे
खरेच लोकांच्या समस्या सोडविणाऱ्या या “बाबा” लोकांना
लोकांची इतकी काळजी आहे तर
काहो मग ते हे काम राजरोसपणे सर्वांसमोर अन फुकटात का करीत नाहीत
ते एखादया उजाड ठिकाणी, स्मशानात, निर्जन ठिकाणी
व भली मोठी रक्कम उकळून ही कृष्णकृत्ये का करतात ?
खरच या लोफर, ढोंगी लोकांना,
लोकांच्या समस्या सोडविण्याची कला अवगत असती
तर त्यांनी ही असली कृष्णकृत्ये, लोकांना भीती दाखवून,
त्यांच्याकडून पैसे लुबाडून केली नसती
ज्या लोकांना खरच ज्ञान असते
ती व्यक्ती कधीच आपल्या ज्ञानाचा गवगवा करीत नाही
व आपली सारी हयात सामान्य जनतेच्या भल्यासाठी खापी घालते
ही असली कपटी मंडळी लोकांच्या भोळेपणाचा,
त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन
स्वतःस फार मोठा “बाबा“, “गुरु“, “अवलिया” संबोधून
त्यांच्याकडून पैसे ऐठत असते
मूर्ख ही कपटी, स्वार्थी मंडळी नाही,
तर मूर्ख आपण जनता आहोत
संकटांना सामोरे जाण्याऐवजी
अजून जास्तीची संकटे अंगावर ओढवून घेत आहोत