काल एस. टी. बसमध्ये प्रवास करतांना
माझ्या शेजारचा प्रवासी फोनवर बोलत असतांना
पलीकडून त्याच्याशी बोलणारा इसम त्याला म्हणाला
“अरे, तुला माहित आहे का, तो आपला बबन्या आहे ना …..
……. त्याचा व्यवसाय डुबल्याने तो कर्जबाजारी झाला यार…..
….. मला तो परवा एका झाडाखाली कुत्र्यांना पोळी खाऊ घालत असतांना दिसला“
ते ऐकताच माझ्या शेजारचा प्रवासी त्याला ताडकन बोलला
“अरे काय रे हा वाह्यातपणा,
जो तो पहा कर्जमुक्ती व्हावी म्हणून कुत्र्यांना रोटी खाऊ घालत असतो“,
माझ्या शेजारचा प्रवासी परत पलीकडून फोनवर बोलणाऱ्या इसमाला म्हणाला
“खरच का रे अशाने कर्जमुक्ती होणार आहे काय ? काही तरी मूर्खपणा,
कोणी काही सांगतो अन आपण बावळटासारखे वागतो“
ते ऐकून मी शेजारच्या प्रवाश्याकडे पाहिले अन मनोमन त्याचे कौतुक केले
तो शेजारचा प्रवासी वय असावे अंदाजे पंचावन्न वर्षाचे,
पण होता तो दिलोदिमागाने सुशिक्षित
म्हणूनच तर त्याला हया असल्या खुळचट गोष्टी योग्य वाटल्या नाही
आपण फक्त देखावा करतो
स्वखुशीसाठी ऐपत नसतांनाही डोंगरभर कर्ज डोक्यावर रचून ठेवतो
जेव्हा ते फिटत नाही तेव्हा
मंदिर, मस्जिद, दऱ्याखोऱ्यात, वेगवेगळ्या जनावरात आपल्याला देव दिसू लागतो
देवळात जातो अन टोपलीभर पूजेच साहित्य दोन्ही हातात मिरवत
मोठ्या गर्वाने इतरांकडे तुच्छतेने पाहत देवळाच्या पायऱ्या चढतो,
प्रसाद ही अगदी थोडा देवापुढे ठेवतो
अन महाग म्हणून कोणासही न वाटता, घरी थोडा थोडा खाण्यासाठी
फ्रिज मध्ये आणून ठेवतो,
शान मारण्यासाठी QR Code ने देवाला पैसे दान केले म्हणून
दहा लोकांना पैसे paid केल्याचा मेसेज दाखवितो
अरे मित्र हो, आधी तुमच्यातला गर्व नाहीसा करा, कुणाला कमी लेखू नका
तुमच्या गरजा कमी करा, अवास्तव खर्च टाळा, मोठेपणा सोडा,
मग पहा कशी सुखसमृद्धी तुमच्या घरात नांदते
ना त्यासाठी तुम्हाला मंदिर, दर्ग्यात दान दयाव लागत
ना जनावरांना रोटी खाऊ घालावी लागत,
वृत्ती ठेवा संतोषी, मग थोडयाशा पैशात ही भागते
हे तुम्हीही अनुभवा अन दहा लोकांना ही सांगा
कारण “मन चंगा तो कटौती मे गंगा“