ज्या दिवशी असते गर्दी नाही जात मी दर्शना कुठल्या धर्मस्थळी
मज वाटते जैसे असते घरावर पाटी घरमालकाची,
ओळखले जाते त्याचे निवास त्याच्या नावाने, तैसे
त्या दिवशी ती वास्तू असते केवळ त्या प्रभूच्या नामाची
मग लंब्या कतारीत उभा राहून का घालू व्यर्थ वेळ मोलाची ?
देव नसेच त्या समयी त्या ठिकाणी, धर्मगुरूंचा राखीव दिन तो
देवास असे त्या दिवशी तिथे येण्यास मनाई
भक्तांची गळचेपी करण्या, त्यांच्याकडून पैसे उकळण्या
दिसती व्यस्त तिथे पुजारी, मौलवी वा पाद्री
असे त्यांना घाई अभिषेक, बाप्तिस्मा वा कलमा पढण्याची
लांबच लांब रांगेत उभे राहून, हातपाय दुखवून
कोणी मधे घुसता, हटकताच, त्याचे बोलणे खावून
मज न आवडे घेणे असे देवदर्शन अपमानित होवून
गोंधळ गोंगाटात, चेंगराचेंगरीत मी नाही देत माझा बळी
घेतो दुरूनच दर्शन राहून उभा निर्जनस्थळी
गर्दीत जाऊन दर्शन घेणे म्हणजे गुन्हाच
अशा वेळी जो तो होतो महापंडित
गाभाऱ्यात जमलेली, ज्याची लायकी नाही
अशी मंडळी ही आपले पांडित्य असतात पाजळीत
कसे बसे उभे राहता देवासमोर पटकन कोणी म्हणती
“का हो पायावर पाणी घेतल का ?”,
कोणी माळ जपता जपता म्हणती “कंबरेचा बेल्ट काढा“,
प्रसाद देता–देता पंडित, मौलवी, पाद्री तुच्छपणे म्हणती
“प्रसाद उजव्या हातात घ्या, काय हे ही सांगाव लागती?”
ते ऐकून बाकी मंडळी ही आपल्याकडे चमत्कारिक पाहती
अन त्या पंडित, मौलवी, पाद्रीकडे पाहून
खरच ते आहेत किती विद्वान म्हणून, आपल्याकडे पाहून, दात काढून हसती
ते धर्मगुरू ही स्वतःला काही वेगळेच समजून
वावरती सोवळ्यावर, दोन हात दूर राहती लोकांपासून
अंतर राखून, उंचावरून प्रसाद हाती टाकून, इतरांना अछूत समजती
नको रे बाबा मला असा देव, जो मोहमायेच्या मागे लागतो
माझा देव तर सामान्य जनात आहे, प्राणी मात्रात आहे
गरिबांना दोन घास खावू घालतो, जनावरांना पाणी पाजतो,
माझा देव मला मंदिर, मस्जिद, गिरिजाघराच्या
पायथ्यावर ही उभे राहून दर्शन देतो
तेथे बसलेल्या भिकाऱ्या अन कुत्र्यांच्या सान्निध्यात राहून
त्यातलाच मी एक बनून, साऱ्या दांभिकतेला बाजूला सारून
न देता कुणाला बोलण्याचा मोका, विधात्याची करुणा भाकतो
मनोभावे हात जोडून, निर्भीड होऊन, त्यासमोर व्यथा मनीची मांडतो