भारत ही संतांची भूमी आहे
ईथल्या प्रत्येक नरात शिव
अन नारीत पार्वती आहे
“बंधू आणि भगिनींनो“
ही आमची वाणी आहे
प्रत्यक्षात मात्र वेगळी कहाणी आहे
कित्येक महिला आणि बालिकांवर
घृणित अत्याचार होती येथे
कोणी “निर्भयासम” लचके तोडी तिचे
हजारो नरराक्षस विवस्त्र करून घुमविती
असहाय माय–बहिणींना
पुरवून स्वतःच्या इंद्रियाचे चोचले
हुंड्याच्या आगीत जळती कुणाच्या लाडक्या लेकी
तर रूढी–परंपरेच्या बुरख्याआड
आपल्या नातेवाईकांच्या वासनेस त्या बळी पडती
आहे आमच्या देशात लोकशाही
कायदयाची कमी नाही
पण रस्त्यात, गल्लीबोळात मुलीबाळींना छेडतांना,
ऍसिड फेकून कुमारिकांचे चेहरे भाजतांना
हैदोस माजवीत, मोकाट फिरत, हैवान दिसती
वसतिगृहात तरुणींचे मुडदे पडती
तर अनाथआश्रमात अत्याचारास फुटू नये वाचा
व ऐकू येऊ नये बालिकांच्या किंकाळ्या म्हणून
“अधेड उम्र के अंकल” त्यांचे तोंड दाबती
आपल्या पोराचे कुकृत्य माय–बाप झाकती
अन सगळा दोष बाईवरच लोटती
जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या जयंत्या साजऱ्या करती
लक्ष्मीपूजनाला देवीच्या गळ्यात हार घालती
अन, पैसा अन ताकदीच्या जोरावर
बारमध्ये “बाला” नाचविती
दररोज अत्यंत बीभत्स व किळसवाण्या बातम्या
दृकश्राव्य माध्यमांवर पहावयास मिळती
कुणी हया विरुध्द “ब्र” उच्चारता
तिथे ही जात, समाज आणती
हे पाहून मनास प्रश्न पडती
खरोखरच हीच काय ती संत–महात्मे अन देवीदेवतांची धरती ?